नवी मुंबई : सोमवारी शहरात तीन महिन्यानंतर दैनंदिन करोना रुग्णसंख्या दोन अंकी झाल्यानंतर मंगळवारी शहरात मोठय़ा प्रमाणात मुक्तसंचार सुरू असल्याचे चित्र होते. बेलापूर, नेरुळ, वाशी, कोपरखैरण, ऐरोली, तुर्भे या सिडकोच्या नोडमध्ये मंगळवारी मोठय़ा प्रमाणात वाहनांची वर्दळ दिसून येत होती. त्यामुळे सिग्नल नेहमीप्रमाणेच व्यस्त होते. कडक र्निबध तोडणाऱ्यांसाठी एकही पोलीस प्रयत्नशील असल्याचे दिसून आले नाही, असे पालिकेच्या दक्षता पथकातील एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
या सर्व परिस्थितीमुळे ‘फाजील आत्मविश्वास करू नका, करोना गेलेला नाही, तो आजही आहे..’ अशा आशयाची एक जाहिरात पालिका प्रशासनाला समाज माध्यमांवर करावी लागली आहे.
नवी मुंबईत करोना रुग्णांची संख्या दिवसाला एक हजार ४०० पर्यंत गेली होती. त्यामुळे सक्रिय करोनाबाधित रुग्ण एक लाखांच्या घरात गेले होते. राज्य सरकारने १३ एप्रिलपासून लागू केलेल्या कडक र्निबधांमुळे करोना रुग्णांची संख्या कमी होण्यास हातभार लागला आहे. सोमवारी ही संख्या सर्वाधिक कमी म्हणजे ९४ झाल्याने नवी मुंबईतील नागरिक मोठय़ा प्रमाणात बाहेर पडल्याचे दिसून येत होते. जणू काही नवी मुंबईतून करोना गेल्याचे वातावरण संध्याकाळी अनेकांना पाहण्यास मिळाले. पामबीच व ठाणे-बेलापूर या दोन महत्त्वाच्या मार्गावर वाहनांची मोठय़ा प्रमाणात वर्दळ असल्याचे चित्र होते. त्यामुळे महत्त्वाच्या सिग्नलवर देखील वाहनांची संख्या दिसून आली. त्यामुळे कुठे आहेत कडक र्निबध अशी प्रतिक्रिया काही अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांनी व्यक्त केली.
गेले अनेक दिवस नागरिकांनी सांभाळलेल्या संयमामुळे शहरातील करोना रुग्णांचा आकडा कमी होऊ शकला आहे. मात्र त्याचवेळी हा आकडा काही अतिउत्साही नागरिकांच्या संचारामुळे वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या संपूर्ण काळात नवी मुंबई पोलीस अत्यल्प प्रमाणात रस्त्यावर दिसून आले, असे एका पालिका अधिकाऱ्याने सांगितले.
सुरक्षित अंतर, मुखपट्टीचा वापर आणि स्वच्छता या त्रिसूत्रीचे पालन सर्वच नागरिक करताना दिसून येत नाहीत. दुसऱ्या लाटेत अनेकांचा जीव गेला आहे. तिसरी लाट अजून येणार आहे. अशा वेळी फाजील आत्मविश्वास नडण्याची शक्यता आहे. तेव्हा कमी आकडय़ामुळे नागरिक बेफिकीर झाल्याचे दिसून येत असल्याचे बेलापूरचे सिडको अधिकारी नितीन कांबळे यांनी सांगितले.